Powered By Blogger

Thursday, March 10, 2016

काही मागचं थोडं..! :-)


♥क्षण..! ♥

काही मागचं थोडं..!

मी माणसं वाचायला कधी शिकणार? अशी खंत माझ्या कुटुंबातल्या काही सदस्यांना एकेकाळी होती...

माणसांना वाचून व्यक्त करायचं नाही असं तत्व मी जपलं आणि जोपासूनही पाहिलं..

काहींना मी व्यक्त करावं अशी अभिलाषा होती तर काहींसाठी मी कुणालातरी व्यक्त करावं अशी अपेक्षा होती...

अर्थात गुणाचा तेवढा हा स्वभावच होता आणि आज आहेही की या पैकी स्वतःला व्यक्त करण्याशिवाय मी काही एक केलं नाही...

माणसं वाचायला शिक म्हणण्यामागे कदाचित बाळबोध समज असाही झाली की, एखाद थोर व्यक्तिमत्त्व, भोंदू, पिर, आदरातुल्य गुरु किंवा प्रेरणास्रोत एखादा मी निवडावा आणि वाटचाल करावी...

प्रत्येक पावलावर स्वतःचा मतलब घेऊन दारात उभे राहिलेल्यांची गर्दी एकसारखाच अनुभव देत गेली ती तोच अनुभव अजूनही देत चाललीही आहे...

पण मी संधीला फारसं दवडलं नाही.. गालावर नाही जमलं तर कागदावर व्रण मी कोरुन ठेवली...

त्याचा परिणाम म्हणून माझी सुरुवात   प्रत्येकवेळी नव्याने होत गेली... याच्या माघारी आमच्यामुळे असं श्रेय स्वतःच स्वतःला देणारी माणसे फार उरलीच नाही...

जी माणसे उरली ती मी टिकवली नाही आणि जी माणसे टिकवली त्यांना मी विचारलं नाही... स्वार्थ जेवढा माझा त्याहून अधिक व्यवहार मात्र कुणाचा होता याचा हिशेब नक्कीच लाऊन बघणार काहीजण...

या सगळ्याचा आज उलगड यासाठी की, मी मागची पानं फक्त चाळतो त्यांना वाचलंय असा भ्रम बाळगला तर ठीक आहे... कारण माझं आयुष्य अजून त्याच उंबरठ्यावर उभं आहे जिथे पुढ्यात एवढं काही येतं की, मागचं मागच्याच मागे कुठेतरी राहून जातं मग ती माणसं स्वतःत माणसंच असली तरीही...

त्यामुळे पैसा कसा कमवायचा कसा गमवायचा हाताचा मळ वगैरे सगळं जुनं झालं...

कुठं कोणती माणसं कमवायची.. गमवायची.. धरायची.. सोडायची आणि सोडून द्यायची यापेक्षा...

आपण आपली पावलं सांभाळायची कारण ती धरायला आणि ओढायला कोण किती मातीतल्या धुळीत असेल सांगता येत नाही...

आणि राहिलं मी तर मी एक 'क्षण' म्हणून कधीच निसटलोय... स्वतःच्या हातातूनही आणि एपतीतूनही...

मग मागचं पुढचं करायला काहींना अवधी मिळाला की वेळ जायला त्यांचं फावतं... कारण त्यांना वाटतं की माझा पुढचा प्रवास यांच्यातर्फे झालाय पण ज्याला प्रत्येक प्रवास मग तो रोजचाच का असेना नव्याने कसा करावा हे कळत असेल तर त्याच्या वाटेतील प्रवासी तुम्ही असता आणि तो म्हणजे मी स्वतःच एक प्रवास होऊन उरतो... आणि बदलतोही नव्याने व कदाचित वेगळ्यानेही... कुणास ठावूक...

वाटेत भेटलेल्या जवळपास सगळ्यांनाच मी तरी विसरलोय पण या सगळ्यात खरी मज्जा येत किंवा येणार आहे ती मला लक्षात ठेवणाऱ्यांची...

कारण, कुठे थांबायचं आणि कुठे थांबवायचं स्वतःला हे मला चांगल्याने कळते... मग तिथे पुन्हा शून्यापासून प्रवास सुरु करावा लागला तरी हिशेब पुन्हा नव्याने स्वतःला बरबाद करण्याचाच केला गेलाही आणि जातोही... आपल्याकडे अजून काहीतरी आहे पुन्हा उधळायला मग ते शब्दांच्या जीवावर असलं तर त्याचे मानकरी पहिले भाषिक मन होते.. मग लेखणीतली शाई होते.. नंतर कागदाचा भू प्रदेश होतो.. नंतर अक्षरं होतात आणि शेवटी एक संथ प्रवाहाला बघणारी नजर होते...

काळानुसार मी कागद बरीच बदलूनही शब्दांची घरंदाज एट बदललीच नाही... कारण माझे शब्द स्वार्थी नसले तरी स्वाभिमानी निश्चित आहेत म्हणून काही फार मागचं बाकी राहातचं नाही आणि नव्याने सुरु होणारा प्रवास संपत नाही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment