Powered By Blogger

Monday, March 31, 2014

सैरभैर..!

क्षण..!

सैरभैर..!

कधी कधी बरेच काही अनावर होवून जाते. असे का झाले अन् असे का घडले? मनातल्या मनात द्वंद्व सुरु झालेले असते. जिद्द कुठे कमी पडली असते कि, चित्त हरपलं असते? डोके दुखी जुण्या पिडा सारखी समोर उभी राहाते अन् डोळ्यासमोर फक्त अंधार उरला असतो. काय करु नये यापेक्षा काय करावे याचा सतत विचार केला जातो. तेव्हा येव्हढेच करुन बघा न फक्त भानावर राहा, बंर वाटेल..!
.
© मृदुंग
kshanatach@gmail.com

Sunday, March 30, 2014

दैनिक जळगाव माझा..! (लेख प्रसिद्ध)

क्षण..!

दैनिक जळगाव माझा..!
(www.jalgaonmaza.com)
लेख प्रसिद्ध..! :-)

गुढी पाडवा..!

ग्रंथांचा आधार घेता पुराणात पाडव्याबद्दल ब-याच कथा प्रचलित आहेत. यात सर्वश्रुत असलेली कथा अशी की, चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम-लक्ष्मण सितेसह अयोध्येला परतले होते. रावणाचा वध करुन शांतीचा आणि एकोप्याचा धर्म पुन्हा प्रस्थापित झाला होता. चौदा वर्षानंतर प्रजेला पूजनीय असलेल्या त्यांच्या राजाच्या स्वागत प्रित्यर्थ संपूर्ण नगरात प्रत्येक घरी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. त्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते ते राम नवमीला संपते अशी प्रथा आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान उरकून गुढी उभारली जाते. गुढी अर्थात एका शुचिर्भूत काठीला नवं कोरं कापड किंवा नवी साडी बांधली जाते. त्यावर साखरेची किंवा गोड गाठीची माळ, कडूनिंबाची पाने बांधली जातात आणि वरून कलश पालथा घातला जातो. हळदी-कुंकवाच्या साक्षीने चाफ्याची माळ चढवली जाते. अशी गुढी घरातल्या अंगणात पाटावर उभी केली जाते. गुढीला 'ब्रम्हध्वज' असेही म्हणतात कारण ब्रम्ह सृजनाचे प्रतिक आहे. सूर्याची किरणे गुढीच्या स्पर्शाने घरात पडली जावीत आणि त्यायोगे आनंद अन् नवचैतन्याने आगमन आपल्या घरात-मनात व्हावे असा यामागे हेतू असतो. आणि म्हणूनच मराठी मनामध्ये ह्या सणासाठी एक ममत्वाची आणि अस्मितेची भावना खूप आधीपासून रुजत आली आहे.

विधिवत पूजा झाल्यावर कडूनिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो. आयुर्वेदात कडूनिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. पुढे उन वाढत जाऊन उष्माघातात वात, पित्त, कफ यांच्यात संतुलन ठेवण्याचा पूर्वजांच्या ह्या पुरोगामी बुद्धीचा कल आपल्या लक्षात येतो. नवीन वर्षाचं स्वागत हर्ष-उल्हासाने व्हावे, साखरेच्या माळेसारखा गोडवा घरात असावा असा उद्देश माळेचा असतो. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी गुढीला गुळ-खोबर्‍याचा नैवैद्य दाखवून नारळ फोडून गुढी उतरवली जाते. साखरेची माळ लहान-मोठ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते.

या सोबत गुढी पाडव्याला मराठी अस्मितेचीही जोड आहे. गुढीपाडव्याचा सर्वात जुना उल्लेख हा शालिवाहन म्हणजेच सातवाहन याच्या काळातील. याने परकीय शकांचा पाडाव केला आणि जनतेचे राज्य स्थापन केले. याच दिवशी त्याने आपल्या राज्याचा नवीन शक चालू केला जो आजतागायत चालू आहे आणि शिवकाळातही याच शकाच्या आधाराने सर्व नोंदी केलेल्या आढळतात. सातवाहनाची राजधानी होती 'प्रतिष्ठाण' म्हणजे महाराष्ट्रातील 'पैठण'. तर अशा या सातवाहनाने ज्या दिवशी नवीन शक चालू केला तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही गुढीपाडवा या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता. जे कार्य छत्रपती शिवरायांनी परकीय मोगलांना हरवून केले तेच कार्य सातवाहनाने पहिल्या शतकात करून महाराष्ट्रातील सर्वात पहिले साम्राज्य स्थापन केले. याच दिवशी सातवाहनाने परकीय शकांना धूळ चारली आणि महाराष्ट्र भूमी स्वतंत्र केली.

हुतात्म्यांचे पुण्य स्मरण करुन आजही आपण नवी उमेद डोळ्यापूढे ठेवून आगेकूच करत आहोत. यात सणाची पार्श्वभूमी जाणून घेणं अन् ते पचवणं थोड कठीण होऊन जातं तरीही नावीन्याची मुहूर्तमेढ प्रकर्षणाने मागचाच आधार घेऊन रोवली जाते हे विसरून चालणार नाही. कधीकधी भूतकाळ जरी कटू वाटत असला तरी आज आपण सर्वार्थाने स्वतंत्र असून महाराष्ट्राला प्रगतीपथावर बघत आहोत हे विसरून चालणार नाही. अर्थात घडून गेलेल्या गोष्टी निश्चित बदलणार नाहीत पण जर काही बदलू शकेन तर तो 'आज' आहे. त्यामुळे हा आपला अखंड सांस्कृतिक वारसा आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करायचा आहे. आणि सोबतच मनात मांगल्य जपताना स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा दानवी वृत्तींचा नायनाट करून उज्वल आणि पवित्र महाराष्ट्र घडवायचा आहे.

एक मुलगी शिकली तर एक घर शिकते. आपल्याला आपल्या विचारांना अजुन परिपक्व आणि बळकट करावे लागणार आहे. जळगावच्या बहिणाबाई ते वर्धा जिल्ह्यातिल गाव पिंपरी मध्ये जन्मलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या कर्तृत्वाच्या पणत्यांना प्रत्येक घरात उजेडासाठी झटावे लागणार आहे. जिद्द कधीच संपत नसते आणि हरतही नसते. सणासुदिच्या दिवसांचे महत्व असेच असते. पुन्हा एक नवी उमेद अन् नविन ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्राचा पुढचा ढाचा अजुनच-अजुन सुदृढ तसेच कार्यसक्षम बनवावे लागणार आहे. अर्थात फ़क्त विचार मांडून अथवा त्यांना फ़क्त सांगून काही बदल त्वरित दिसुन येणार नाहीत. विचारांवर ठाम राहून आपण आपलंच घर आधी सुधरवायला सुरुवात करायला हवी आहे. आपल्या एका घरापासुन सुरु झालेली सुधारणा अजुन दोन घरात पोहोचत जाते. कासव गतीने का असे ना पण सुरुवात करायलाच हवी आहे. 

सध्याच्या घडामोडी पाहाता फक्त वादच उरले आहेत. घरघुती वादापासुन, समाजवादा पर्यंत. या सोबतच राजकिय वादही हल्ली चर्चेत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर बर्‍याच गोष्टींना तोंड फुटत असते. या वादात न पडता महाराष्ट्र घडवायला कसा हातभार लावता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे. तरुण पिढीचा कल पाहाता 'स्त्री' मनाचा उलगडा फारसा झालाच नाहीये. चुल-मुल याच्यापुढेही 'स्त्री'ची कर्तबगारी वखाणन्यासारखी आहे. अत्याचाराविरोधात न्याय मागण्याचाही तिला पुरेपुर हक्कही आहे. दरवेळी 'स्त्री'कडे उपोभोगाच्या अन् सहानुभुतीच्या नजरेने न बघता त्यांना स्वरक्षणासाठी प्रेरीत करुन 'स्व' रक्षणाचे मार्ग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. चांगल्या प्रववृत्तीची वाईट प्रववृत्तीवर झालेला विजय दिवस अन् झालं-गेलं विसरुन घरात नव्याने रचलेला आयुष्याचा खेळ हसत खेळत, मतभेद गळून एकमताने आनंदाने साजरे करण्यात सुखाचा खरा अर्थ आहे.
आनंद घ्यावा अन् आनंद द्यावा,
आनंदात व्यवहार कधी नसावा..!
.
पियुष प्रकाश खांडेकर (मृदुंग)
Piyush Prakash Khandekar
7387922843

E-mail : kshanatch@gmail.com

निश्फळच..!

क्षण..!

निश्फळच..!

उगाच काळजी करणं अन् काळजीत पडणं, खंरच कळत नाही असे का वाटणं? तुला माझ्याबद्दल अन् मला तुझ्याबद्दल. इकडून थोडा मी चालत येतो, तिकडून थोडी तू चालत येते. पुन्हा मग पाऊल माघारी जातो अन् सार उगाच होते. चिंता भेडसावत असतेच परी उगा का असे घडत असते?
तुझी समजदार दुनियादारी कि माझी अनुभवी फितूरी. दोन्ही मनात एकच भाव-भावना मग उगाच का एकमेकांच्या हातावर तुरी? समजून उमजून तुही घेते अन् अजान मी उगाच राहातो. लगट करुन भुतकाळाशी वर्तमान थोडा अवदासी होतो.
चालायचेच म्हणत पुन्हा सगळे विस्कटून घेतो. माझ्या मोकळ्या हातांनी स्वार्थी मी होतो. काही आहे कि काहीच नाही. थोडे असुन फार नाही. तुझ्या-माझ्यात अंतर उगाच नाही.
थोड थांबून बघायचे खुप आजमावून पाहायचे. निसटत असलेले क्षण थोडे सावरुन पाहायचे. आयुष्याचे उन्हाळे दुष्काळात फुलवायचे गुलाबी दिस ओसरल्यावर असे होत राहायचे. माझी तू तुझा मी वेग-वेगळे होवून पुन्हा एकत्र यायचे. उगाच अंतर ठेवले जे आसवांत गळून जायचे. नकळत दोघांच्याही एकदा वळून पाहायचे. सर्व तसेच आजही व्यक्तीसापेक्ष परिस्थिती साजेशी. कुठे तरी पाणी मुरतंय अन् कुठे तरी काही अंकुरतंय. जाणून बुजून अंतर जपलं असतंय. नेमक काय आहे अन् काय नसेल शेवटी फोल ठरणार आहे अन् वाटणार आहे 'निश्फळच'..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, March 29, 2014

स्वगत..!

____/|\____
क्षण..!

स्वगत..!

हल्ली मैत्र प्रस्ताव फारसे पाठवत नाही. आलेले मैत्र प्रस्ताव स्विकारल्यावर अनामिक दडपण अन् एखादा दबाव पडलाय असे वाटून जाते. ओळख वगैरे पुढे फार अशी वाढत नाही. नमुद केलेली जुजबी माहिती तेव्हढीच वाचून घेतो. कदाचित माझं वजन वाढतंय कि लोकप्रियतेचा अजुन एक उंबरठा गाठतोय कळत नाही. समोर आलं स्विकारलं, वाटेत आलं ओळखीच बनलं, प्रवासात नकळत समोरा-समोर आलो म्हणून सहप्रवासी झालो. चालत राहिलोय म्हणून जरा थांबून मागचा राहिलेला एक श्वास घेतला. बाकी फार काही नाही ये-जा सुरुच असते. अवघडल्या सारखे कधी कधी वाटते पण ठीक आहे! फार काही असण्यापेक्षा येव्हढ तरी खुपच आहे..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, March 28, 2014

स्वगत..!

क्षण..!

स्वगत..!

ज्या गोष्टी जिथे सुरु झाल्यात तिथेच वाळवी सारख्या वाढत असतात. कधी तरी येवून धुळ झटकून निटनेटके करावे तर सगळेच अर्थहीन झालेले असतात. तिथे हतबल होण्यापलीकडे काही एक करता येत नाही. डोळ्यासमोर असलेलं धुळीने माखलं असते तर हातात क्षणभर घेवून त्या आठवणी टवटवीत फुलासारख्या मनात हसत असतात. क्षणभरच हसणारे ते फुलं वास्तवात कोमेजलेलं असते. आयुष्याचे ते हाती लागलेलं पुडकं होतं तिथेच असण्यात मग सार्थ वाटते. व्यर्थच नको तिथे अतिक्रमण केलं अन् असलेलं सगळ पुन्हा बेढब करुन घेतलं असे नंतर मनात येतं राहाते..! उगाचच..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, March 25, 2014

टोकं..!

क्षण..!

टोकं..!

नात्यांच्या धाग्याची टोकं मी सोडून दिली...ताणून धरुन काय करणार होतो...होय कदाचित थोडे मी ताणूनही धरले होते...वाटले होते तू तरी सैल सोडशील...पण कधीच वाटले नव्हते  मलाच सोडायला भाग पाडशील...हवं होते जसे तुला तसेच तू शेवटी घेतलेस..!
ताणून इतके धरलेस कि ते तुटेल याची साधी पर्वाही तू केली नाहीस...माझा स्वभावही असा कि त्या टोकाची यातना मला पाहावली नाही...तुला जिंकायच छे! हरवायचे होते मला म्हणून मी धरून ठेवलेला माझा टोक सोडून दिला..!
त्या धाग्याला आठवणीत साधा स्पर्ष करायची मला पुन्हा इच्छाच झाली नाही...तुझं समाधान त्यावरही कुठे झाले...पुन्हा येवून त्या धाग्याला जागोजागी तू गाठी मारल्या...त्या गाठीत मला बांधून ठेवायचा प्रयत्नही केलास निश्फळ..!
गमवलं अन् संपलं सगळं बोलून माझ्यामुळे झालं 'आरोप'ही केलास...केलं ते ही मी सहन न दुर राहिलो...तुला जे हवंच होतं ते देवून मोकळा झालो...संतुष्ट तू त्यावर आजही नाहीस...एखादा दुवा मिळतो का माझ्या पर्यंत पोहोचण्याचा सतत शोधत राहातेस..!
आज मी ही तुझी पर्वा करत नाही अन् तुला साधी भिकही घालत नाही...जगातली फक्त एक व्यक्ती आहेस तू माझ्यासाठी...माझ्या आयुष्यात आज तुला कवडी मोलाचेही महत्व नाही...जिथे कुठे होते तुझे साम्राज्य ते बाटवून तुझं अस्तित्व खोडून बसलो आहे...येवून कितीही झट अथवा झगड माझ्याशी तुझ्या ओल्या शब्दाला माझी साधी नजरही आता दुजोरा देत नाही..!
कठोर झालोय अथवा निर्दयी झालोय म्हण...तुझ्या म्हणन्या बोलण्याने मला फरक पडत नाही...तू तुझी दिशा असलीस तर मी ही माझी नशा आहे...तुझ्यापेक्षा माझाच अंमल माझ्यावर आज जास्त आहे...शेवटी मी सोडलेलं टोक तुझ्या टोकापासून तू गुंडाळून घेतलेस...तो धागा आता कुजला आहे...जपून ठेवण्यात काही एक अर्थ उरला नाहीये...मी माझा समुद्र अन् किनारा बनलो आहे...तुझी तू लाट बनून फक्त आदळत असतेस...आज तरी टोक जुळतेय का बघत असतेस...टोकावरच पडलेली गाठ तू उगाचच माझा असा काठ मी...जिव लावून जिवाला तुझ्या...मिळवणार काय आहे मी...दोन टोकावरचे फक्त दोन बिंदूच...तळमळणे बघायचे तुझे सारे हेतूच..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, March 21, 2014

स्वगत..!

क्षण..!

स्वगत..!

आयुष्याचे चढ उतार सुरु असतांना परिस्थिती आणि तिला दिलेलं महत्व मोलाच काम बजावते. एखादा यातनेचा रंग कितीही रगडून रगडून काढण्याचा प्रयत्न केला तरी रक्ताच्या पडलेल्या डागासारखे ते डाग कधी निघत नाही. आठवणी धुसर होतात नजर कमजोर होते निसटलेल्या ओंजळीतल्या क्षणांची निव्वळ सल उरली असते. निश्फळ अन् महत्व शुन्य..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, March 19, 2014

तणाव..!

क्षण..!

तणाव..!

काही दिवस झालेत छे! काही महिने झालेत दोघांनीही मौन पकडलेय...आता काय बोलायचे? तसेही नात्यात विचारलेला एखादा साधा प्रश्नही गरम तेलात पडलेल्या पाण्याच्या एका थेंबासारखा होत असतो...भडका उडाला तरी बेहत्तर एकमेकांसोबत तेव्हढा वेळ तरी जाईल...नाही तर अजुन एक कारण मिळेल साधा वेळही तू कधी देत नाहीस..!
किती ताणावे ना अजुन तेच कळत नाही...तोडायचे तिलाही नसते अन् त्यालाही नसते मग हे बेबनाव तरी का होत असतात..? त्याचा आवाज खर्जातलाच असतो म्हणून साधे बोलण्यातही तो ओरडतोय असे वाटते...त्यावर अजुन तिने टोकले तर सपशेल तो ही मग तिच्या माहेराचा एक दुवा धरुन एक फुसका टोमणा मारतो...टोमणे बाजीत बायकांवर कुठलाही पुरुष वर्चस्व कधीच गाजवू शकत नाही...सपशेल तोच टोमणा त्याच्यावरच त्याच उलटणारे अस्त्र बनवण्यात या बायका माहिरच असतात...फक्त हे निर्देशनात आणि अनुभवात लग्ना नंतरच येत असते..!
समजा त्याचा एखादा टोमणा अगदी सहज बरोबर लागला तर आधी घरात चार भांडी एकेमेकांवर फरशीच्या अंगनात पडतात...त्यावर मग थोड तिखट मिठ लावून परतवण्याचा बायकांचा प्रयत्न फसलाच तर सकाळच्या चहाच्या कपाला कान नसणार हे निश्चित असते...त्यावर घाईचे कारण पुढे करुन विचारले तर दुसरा ठेवणीतला हत्यार डब्यात दिलेल्या भाजीतून मिठ गायब झालेले असते आणि समोरुन निट भाजलेली दिसत असलेली पोळी दुस-या बाजुने जळालेली असते..!
काहीही म्हणा कितीही बरोबर असले तरी शेवटी नमते त्यालाच घ्यावे लागते...रोजच्या याच तणावाला कंटाळून विचारले तेव्हढे आणि हवे नको येव्हढ्यावरच घरातलं तापमान संतुलीत ठेवावे लागते...एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांना हसतातही न चिडवायला जिभ पण दाखवतात...माघार घ्यायचीच नाही अगदी ठरवलेलं असते..!
एकदिवस ऑफीस मधुन मुद्दाम उशीरा येवून तिची काळजी वाढवून त्याला तिला विरघळवायचे जालीम उपाय सापडते...ती ही कुठे कमी असते मनात काळजी ठेवून चेहरा मात्र निर्वीकार ठेवते...ती विचारत नाही म्हणून तो सांगत नाही...काही केल्या तणाव निवळायला दोघांनाही जमत नाही..!
अश्याच मग एका रात्री दोघंचाही हात एकाच उशीवर एकाच वेळी येवून भेटतो...किती तरी दिवसांनी त्यांचा तो अबोल स्पर्श एकमेकांच्या मिठीतल्या शय्येत सगळे रुसवे फुगवे विसरतो...रात्र घामात भिजत जाते...श्वासात श्वास गांधाळत जातात...त्याच्यात विरघळण्यास ती आतुर होते...तो तिच्यात रुजण्यास आतुर होतो...विचारांचे ते मानसिक तणाव  शरीराच्या देवाण-घेवाण मध्ये हरवून जातात...उरतात काही तर ते दोघे एकमेकांचे...एकमेकांच्या पुर्ण हक्काचे अन् धुंद झालेले त्यांचे 'क्षण' तणावातले..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, March 18, 2014

असच काही तरी..!

क्षण..!

असच काही तरी..!

कागदावर तसे कुठलेही विषय मत मतांतर होवून मांडले जात असतातच. तरीही एखादा विषय आवडीचा असतो किंवा खोलवर रुतला असतो त्याच्या चौकटीतला प्रभाव कागदावर अगदी सफाईदारपणे राजरोस उमटत असतात. यात एकाच विषयाची अथवा एकाच आशयाचा चोथा पुन्हा समोर आल्यासारखी कधी कधी आपली अवस्था होते. यात वावग असे काही एक नसते. बदल नेहमी अपेक्षीतच असतो परंतु त्या एखाद्या विषयाला सतत मांडून सराईत झालेला आपला हात इतर विषयांच्या मानाने त्या एकाच विषयात स्वत:ला सहज समरस करुन मोकळा अनुभवत असतो. कागदही संतुष्ट होत असतो अन् जे आधीच लिहून घडून गेलेय त्या शेवटात अजुन एक सुरुवात रुजलेली असते. त्यामुळे एकाच विषयाचा कंटाळा करण्यापेक्षा तो एकच विषय सतत चघळून साखरेसारख एक तर गरम चाहा मध्ये विरघळावे तरी अथवा त्या साखरेच्या दाण्यांना मुंग्या तरी लागाव्यात. कुठली तरी अर्थहीन गोष्ट एकदिवस अर्थपुर्ण अनुभव देतच असते कारण बस! आपण तोच विषय चघळायचा कि मुंग्यांची वाट पाहायची आपल्यावर असते..! (विनोदात घेतले तर साखरेची महागाई मुंग्यांच्या पोटात स्वाहा करणे आपल्याला रुचनार नाही चघळणेच न विरघळणेच त्याचा शेवट चव ठेवून अथवा घेवून)..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, March 17, 2014

प्रतिक्षा..!

क्षण..!

प्रतिक्षा..!

तिची वाट पाहाण्यात पण एक वेगळीच मजा असते...ती येणार हे माहित तर असतेच...पण आल्यावरही मी का आले याचे उत्तरही मलाच प्रश्न करुन विचारणार असते...घुम्यासारखा मी गप्प राहाणार असतो बरेच दिवस भेट न झाल्यामुळे तिचा राग, त्रागा, चिडचिड, कटकट मुकाट सपाट चेहरा करुन ऐकणार असतो...तेव्हाही माझे शांत राहाणे माझ्याच घश्यात अडकणार असते..!
आठवण येतच नाही ना तुला माझी...कधी फोन केला नाहीस साधा एक मॅसेज पण केला नाहीस...नेहमी मी का म्हणून मागे यायचे तुझ्या...तुलाच काही घेण-देणं नसल्यावर...मी तिची नजर चुकवून गालात थोडे हसायचे असते अन् तिला ही चोरी माझी पकडून अजुन भडकायचे असते...कसं व्हायचे माझे स्वत:लाच विचारते न जळजळीत नजरेने मला खाऊ कि गिळू या पवित्र्यात बघते..!
ओठात मी निरागस हसतो...तिच्या गळ्यात हात टाकतो...तर्जणीने तिच्या हनुवटीला आधार देवून वर उचलतो...ओठात अंतर थोडेच उरले असते...माझ्या नियंत्रीत श्वासात तिचा अनियंत्रीत श्वास मिसळून तिला शांत व्हायला एकच क्षण पुरतो...तिचे डोळे हसतात गुलाबी गाल आरक्त होतात...पुन्हा दोन हाताचे अंतर ठेवून मी तिच्या समोर जावून बसतो..!
मौनात मग बराच प्रेमळ संवाद सुरु असतो...तिच्यासाठी आणलेली प्राजक्ताची फुले तिच्या ओंजळीत विसावतात...तो अनिमिश नेत्राने तिला बघत असतो न एक गजरेवाला दोघांमध्ये येतो...तो तिच्याकडे एक नजर बघतो ती फक्त पापण्यांनी संम्मती देते...एक गजरा विकत घेवून तो तिच्या पुढ्यात ठेवतो...तिचे आक्रमक शब्द पुन्हा तिच्या ओठातून बाहेर पडतात...घेतलास तर माळणार कोण इथे जवळ आरसा पण नाहीये माझ्या...तो मुकाट केसांत माळतो तिच्या न डोळेभरुन तिला बघतो...त्याच्या नजरेच्या आरश्यात तिचे सौंदर्य तिही बघुन घेते..!
सांज व्हायला अजुन अवकाश कितीसा उरलाय आता...आज तरी येईल ती प्राजक्ताची नवी फुले घेवून तो निघतो...वाटेत गर्दीत वैतागतो वेळे आधी पोहोचायचे स्वत:ला बजावतो...तिच्या नंतर पोहोचला तर काही खैर राहाणार नसते...नेहमीची वेळ होते ती काही येत नाही...गजरेवालाही एकटे त्याला पाहून जवळ त्याच्या येत नाही...त्याने आणलेली प्राजक्ताची फुले त्याच्याच ओंजळीत हिरमुसतात...तो मात्र त्याच परतणा-या वाटेच्या प्रतिक्षेत त्यांचा गंध उधळून ठेवतो...क्षणातच..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, March 15, 2014

सुखाची कल्पना..!

क्षण..!

सुखाची कल्पना माझी येव्हढीच आहे. जेवनाचे ताट वाढून भरवायला येता तू मी घरभर रांधत फिरणे, उसणे दटावून तू कान धरावा माझा न एका ठीकानी शहान्या बाळासारखा बस म्हणावे. तिथेही तुला जिभ दाखवून मी पळ काढावा न तू तुझ्या कपाळावर हात मारुन वैतागून बसावे. हसत हसत रांधत तुझ्या मांडीवर डोक ठेवावे मी न तू तुझ्या हाताने एक घास मला भरवावा..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, March 13, 2014

ओढ..!

क्षण..!

ओढ..!

त्या दिवसा नंतर आमच्यात फारसे बोलणेच झाले नाही...गरज तिलाही वाटली नाही न... आवश्यक्ता मलाही वाटली नाही...बस एकमेकांना पाहून नजरच चुकवत गेलो दोघेही...जणू गुन्हाच केलाय एकमेकांशी बोलूण...स्पष्ट असे काही नव्हतेच कधी काही...बस ओढ होती एकमेकांची...एकमेकांना जाणून घेतल्यावर शब्द कुठे आमचा एकमेकांना असा भिडलाच नाही..!
सुरुवातीची हुरहुर न कासावीस होणे एकदम बंदच झालेय...एकमेकांचा विचार करुन आता कुठे काय करत असणार माहित  झालेय...अवाक्षर बोललो नाही ना जरी मुखाने तरी पानभर लिहिले जाणार हे कळतेच...क्षणभर येऊन ती आसवांचा पाऊस पाऊस खेळते...कागद चिखलासारखा करुन ठेवते...चुरगाळून मी ही कागदाला तिचा अश्रु बघुन घेतो..!
तक्रार नाही न मागणेही आता काहीच नाही...सुटत गेली प्रश्न म्हणून आता उत्तरासाठी एकही प्रश्न नाही...विचारावे काही तर उत्तर काय देणार हे आधीच माहित असते दोघांचे दोघांना...त्यामुळे आता आमच्यात तो औपचारीक प्रश्नही उरला नाहीये..!
तरी आम्ही दोघ एकमेकांची चातकासारखी वाट बघतो...बोलणार काहीही नसलो तरी कागद एकमेकांना देणार असतो...माझ्या माघारी ती तिच्या आसवांसकट उपस्थिती लावून जाणार अन् मी...तिच्या माघारी येऊन जुणा कागद नेवून दुसरा अजुन एक कागद ठेवून जाणार...दरवेळी माझा कागद एकच असतो...दरवेळी तिचा थेंबही एकच असतो...बरेच काही संपुनही आता बरेच काही सुरुही झालेय...तिला कागदाची ओढ लागलीये...मला तिच्या आसवांची ओढ लागलीये...दररोज नव्याने नव्या कागदावर एक क्षण असतो माझा...त्याच कागदावर ओघळलेला एक अश्रू असतो तो तुझा..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, March 10, 2014

विश्वास..!

क्षण..!

विश्वास..!

विश्वास कसा असतो रे सांगतोस? विश्वास कुठल्या चौकटीत अथवा बंधनात नसतो. विश्वास हा पावसाच्या थेंबांसारखा असतो. थेंब-थेंब होवून होणारे पाणी, साचणारे डबके, होणारे तळे, बनणारी नदी अन् शेवटी वाढणारी सागराची पातळी. हे कसे? पावसाचा थेंब कुठे पडतोय हे त्याला माहित नसते. त्याचा तो फक्त थेंबच असतो. घाणीत, नाल्यात, साठवलेल्या कच-यातही तो पडतो. स्वच्छ मोकळी जागा पाहून तो पडतच नाही. त्याच्या वाटेत आलेलं प्रत्येक वळन तो स्विकारतो. अस्वच्छ जरी असले तरी स्वत:साठी प्रत्येक क्षण तो स्वच्छ अन् नवा बनवतो. उदा. निसर्गाची नवी पालवी. सुरुवातीला गढूळ असलेलं पाणी थोड्या दिवसात काचेसारख चकाकतांना दिसते. निर्माल्य न इतर घटक जरी एकरुप झाले त्यात तर वाहात राहून त्याच जागेवर चांगलं पाणी लगेच दिसत असते. कारण माहितीये का? कारण त्याचा स्वत:वर विश्वास असतो. साचुन तो प्रवाह बनतो सागरात एकत्रीत आल्यावर तोच थेंब लाट बनतो. कारण तो घटक अन् माध्यम कसा आहे ते बघत नाही. त्याच्या अस्तित्वाने काय बदल होईल त्याला माहित असत नाही. त्याचे तो कर्तव्य तरी निभावतो. पुढे काही नसेल असेच समजुन जगतो. मातीत मुरतो अन्यथा जमिनीवर साचुन स्वत:चे अस्तित्व ठेवतो. विश्वास असाच असतो उडतो तरी पुन्हा पाण्यासारखा विरघळून आपण करतो. मग वाटेत अडचणीचे तापलेली जमिन, जमिनिवरची रेती, मोठमोठे खडक आलेत तरी प्रवाह त्याचा एकदिवस त्याच्याच वाटेने-दिशेने सगळे तत्व अस्तित्वात स्विकारुन एक निसर्ग स्वर्गासारखा पाण्यातच विश्वासातून निर्मान होतो. फरक येव्हढाच अन् शेवटही येव्हढाच आपण तो खरंच स्विकारतो कि स्विकारल्याचा आव आणतो आपल्यावर आहे..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com