Powered By Blogger

Thursday, July 31, 2014

लेख प्रसिद्ध..! :-)

आजच्या लोकमत ऑक्सिजन मध्ये लेख प्रसिद्ध "बंद कर, ही रिपरिप..!" :-)

Tuesday, July 29, 2014

परिस्थिती..! :-)

क्षण..!

परिस्थिती..!

सहसा आपण परिस्थितीच्या पायरीवर उभे असतो. या परिस्थितीच्या पायरीला नियतीने कदाचित चार चाके लावली असावीत. स्वत:च्या ओझ्याचे संतुलन करुन स्थिर उभे राहायला म्हणून अवघड जात असावे. तोल गेला, जास्त चुळबुळ केली तरी पायरीवरुन पडणे निश्चित असते. एव्हढ-तेव्हढ नको म्हणून परिस्थितीचे गुलामच एक प्रकारे. त्यातही पायरी गाठायला सोडून मिळवायलाच झटापट जास्त होते. स्पर्धा काय तेव्हा मग उपहासात्मक वाटून जाते. परिस्थिती बदलायला कुठे तरी आपला हातभार अथवा आपण जबाबदार आहोत हे लक्षातच येत नाही. लक्षात येते तरी केव्हा? जेव्हा अवाक्या बाहेरचे न पेलवणारे ओझे घेवून या परिस्थितीच्या चार चाके असलेल्या फळी वरून जमिनीचा आणि आपला संगम होतो तेव्हा. थोड खरचटलं वाटत असते निरखून पाहिल्यावर जखम खोल झालेली असते. आरोप कुणावर करायला चुकही कुणाची नाही स्वत:चीच झालेली असते. गुदमरायला न स्वत:च्या नजरेत पडायला खरी सुरवात तेव्हा होत असते. जिद्द मरत नाही आत्मीक बळ बंडखोर करुन, पेलेल तुला एव्हढ सगळं ओझं घेवून, संतुलीत स्थिर उभं राहायला बजावत असते. उठण्यासाठी तरी आधार शोधला जातो. पण इतका वेळ ज्या पायांवर उभे असतो, त्यांच्यावरच पुन्हा विश्वास नसतो. पण! कुणी येत नाही. एकटेच स्वत:ला सावरत उभे राहून ही निसटलेली पायरी पुन्हा बसवून पुढे चालायला लगतो. अनुभव गाठीशी असतात, पायरीच्या स्वभावाशी परिचय झालेला असतो. पुन्हा परिस्थितीच्या नावाने बोम्ब मारायला जिवावर आलेले असते. मुकाट सगळे बंद ओठातल्या ओठात परतवत, लटपटत्या पायांनी शिखराच्या टोकावर कधी पोहोचलो कळत देखील नाही. त्यावेळेस जगापेक्षा स्वत:ला सांगण्यात मजा येत असावी. "परिस्थितीने परिस्थिती भलेही बदलता येत नसेल, पण आलेल्या परिस्थितीला तोंड देवून जगायला न मिळण्यापेक्षा जगणे मिळवायला खरंच मजा आली..!"
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Sunday, July 27, 2014

लोणचे..! :-)

क्षण..!

लोणचे..!

सत्तरी उलटली तिच्या वयाची... तरी आयुष्याच्या लोणच्याला प्रेमाची सर तशीच आहे... चष्म्यावर साचलेले तुषार रुमालापेक्षा तिच्या पदराला पुसत जवळ बसलो... कसं जमलं असावं आणि कसं बंर जमत असावं... सुरवातीच्याच स्फुरतीने बरणीत एकरुप होत असावं... दरवेळी विचारता विचारता राहून जाते...आंबट-गोडव्याचे प्रमाण कसे चुकत नाही... सार असतो गोड पण कैरीचा आंबट गुणधर्म तसाच का राहातो... रोज सकाळ संध्याकाळ बरणीतले लोणचे आवर्जुन फिरवत बसते... सगळ्यांच करण्यात भिंगरी तिच्याच पायाला बांधली असते... चव मात्र जिभेवरुन काही केल्या ओसरत नाही... नजर भरुन बघत असते अन् घरभर त्या लोणच्याचा सुवास दरवळतो... मातीचा वास न लोणच्याचा सुवास... कुठे तरी घराच्या भिंतीत चिकटून राहातो... भेगा जातात भिंतींना रंगही पापुद्रे होवून निघू लागतात... ती तशीच पदर कंबरेत खोचून तयार सगळे काही सावरायला... थकवा उसंत माहितच नसावे जणू... कर्तव्य बोलावे तरी कसे अवाक्या बाहेरचे प्रेमच असे... तोच परिघ तोच वर्तुळ आणि तिच टिकावू बरणी... दरवर्षी मुरणारा तोच पदार्थ पण अगदी नव्याने... चष्म्यावर साचलेले तुषार पुसत पुन्हा डोळ्यावर चढवून चोथा झालेल्या बातमीचा आस्वाद घेत बसलेला मी... काय करताय म्हणत हातातला पेपर बाजुला ठेवून, "घ्या बटाट्याच्या पराठ्या सोबत लोणचे खाऊन बघा"... नेहमी सारखेच अरे वा! म्हणत कैरीची फोड चोकून, मुरलंही का लोणचे? खोचट टोमणा मारुन न थांबणा-या राजधानीच्या मुखातल्या बडबडीचा रस्वाद घेत पॅसेंजरच्या वेगाने हळूच एक घास तिला भरवून मिश्किल हसणारा..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, July 24, 2014

काजवा..! :-)

क्षण..!

काजवा..!

एक काजवा रातराणी जवळ येवून बसला
उजेड देवू का तुला थोडा विचारुन हसला,

उभ्याने लाजली रातराणी वेळ कसा भेटला
उपहास करु नकोस गंध तुझा फिका पडला,

शेजारी उभा चंदन बघ सुगंध त्याने टिपला
प्राजक्ताचा सडा पाहाटे किती वेळा वेचला,

मोहावूनच दवांनी हा मोगरा बाधित झाला
चिखलातला कमळ राजा गुलाब वजीर झाला,

पाकळी पाकळीच जोडत गुलमोहर सजला
म्हणून रंक आणि राव हा रंजक रंग बनला,

एक काजवा रातराणी जवळ येवून बसला
नभातलं चांदणं पियून काळोखावर चमकला..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, July 23, 2014

नैतीक / अनैतीक (संबंध / नातं)..! :-)

क्षण..!

नैतीक / अनैतीक (संबंध / नातं)..!

परवा असंच एका मैत्रीणी सोबत बोलत होतो. अर्थात एन.आर.आय. असल्यामुळे विचारांत बरीच प्रौढता होती. नेहमी प्रमाणे हां, हम्म, बाय होणारच होते. माहित नाही काय आठवले तिला. एक विचारु का विचारले तिने. म्हणटले एक काय दोन विचार. खरे तर विचारायचे नाहीये काही बस! सांगावेसे वाटतंय तुला म्हणून सांगतेय. म्हणालो मग संकोच कशाला? ते असे आहे कि, मी इकडे सेटल होवून जवळ पास बारा वर्षे झालीत. लग्ना नंतरचा गोडवा काय दोन मुलं होण्यातच संपला.
कुटूंब वाढले तसे जबाबदारी सुद्धा वाढली. डॅालर्स कमवायला माझे हे सोळा तासांच्या व्यापात गुंतुन गेले. घरी यायचे तेव्हा मुलांना गुड नाईट म्हणत दोन घास खाऊन सरळ अंथरुनात जावून पडायचे. अर्थात या इथल्या घराच्या आघाडीवर राहून तिकडे भारतातल्या घराची सुद्धा आघाडी पेलत होते. अजुनही पेलते आणि जमेल त्यापेक्षा जास्त सर्वच करायचे. मुलं मोठी झाली न स्वावलंबी देशात असल्यामुळे स्वत:चे स्वत:च करु लागली. मला उद्योग मग फारसा उरला नाही. काही आहेच तर लक्ष ठेवणे. वाहावत जावू न देणे आणि हमखास एखाद्या गोष्टीत आक्षेप घेणे. संवाद माझा माझ्या घरातच मोबाईलच्या स्क्रिनवर होतो. 'Don't wait for dinner', l'll be home @ 10:30 pm., अजुन काय तर यायच्या जायच्या वेळेची लेखी नोंदच. का कशासाठी मतलबच उरला नाही.
काही दिवस असेच गेले. न राहावून थोडा छोटा मोठा उद्योग करुन वेळ जावा म्हणून जॅाब शोधायला लागले. मिळाला देखील कॅफेत काऊंटर सांभाळायला लागले ते पण पार्ट टाईम. फ्री कंट्री म्हणून बरेच तसे संबंध पाहिले. माझेही तसे होतील मला वाटले नव्हते. संस्कार म्हण अथवा काहीही. ही गोष्ट मैत्रीच्या पुढे जावू द्यायची नाही असेच ठरवले. पुन्हा परतायचे भारतात मध्यंतरी वारेही उठले होते. पण! सोई सुविधेच्या न स्वच्छ देशाच्या झगमगाटीत आंधळ्या झालेल्या प्रत्येकाच्या मुखातून एकच निघाले अगदी माझ्या सुद्धा, "What will we do in our dirty india..?"
पुन्हा सुरवातीचा एकही व्रण नसलेल्या देशात, भलेही तो आपलाच असो तिथे नवी सुरवात करायला आज इथे आहे तो बस्तान हलवण्यात इष्ट कुणालाच वाटले नाही. सहाजीक होते फ्रिडम आणि फ्रि कंट्री यात विदेशच वरचढ ठरला. दहा वर्षात पहिल्यांदा अर्धा तास माझे कुटूंब यावर चर्चा करायला एकत्र उपस्थीत होतो. निष्कर्श काय तर इथेच आहे तसेच राहूया निघाला. दोन दिवसांनी सगळे विसरुनही गेलो. आज आठवले तरी आपल्या सोडून एका परक्यालाच सांगायला. मला संवाद आवडतो अगदी काही तरी बोलायचे म्हणून बोलत राहाणारी लोकं मला खुप आवडतात. अश्याच या तोडक्या संवादात कॅफेत त्याच्याशी ओळख झाली. मैत्री झाली न खुप जवळ आलो. घराच्या चौकटी बाहेरच आहे सगळे. भेटणे, फिरणे आयुष्य जगण्याला कारणीभुत एखादा रसिक मिळावा तसे अगदी उत्तम चालू आहे. कुठे तरी मनात चुकल्या सारखे वाटतेय. एक स्त्री म्हणून निश्चित चुकले असेल मी. त्यातही माझ्याच मानसांना फसवत आलेय मी. पण! एक सांग पुर्ण चुक माझीच आहे का? वाद-संवाद सगळे धागे मी धरुन ठेवायला हवे होते का? कर्तव्य म्हणून कुठे कमी पडले नाही. भुक फक्त स्पर्शाची असेही नाही. दोन प्रेमाच्या शब्दांचीच भुक होती आजही आहेच. हक्क असू दे पण! तो ही का मागुनच संतुष्ट होवू?
नैतीक-अनैतीक संबंध आहे कि नातं आहे तेच आता कळेनासे झालेय. पण! एक गरज म्हणून बघीतले तर सगळे फोल ठरतेय असे नाही का? सतारा-अठरा वर्षापासून मनात सलतेय. चुक कि बरोबर तुला विचारण्याचाही अधीकार नाहीये. तरी तुला विचारतेय सांग काय चुकलेय माझे..!
उत्तर असे माझ्याजवळ सुद्धा नाहीये. तुझ्या बाजुचे समर्थन केले तर विचारसारणी न परिपक्व बुद्धीमत्तेचा टेम्भा मिरवत माझ्यापुढे येईल. असमर्थन केले तुझ्या बाजुचे तर बुरसटलेल्या विचारवंतांच्या पंक्तीत जावून बसेल. फार तर काही नाही गरज म्हणून तू तुझी इच्छा पुर्ण करुन घेतली आहेस किंवा घेत आहेस. अपराधी असे तुला ठरवण्यात दोष तुझाही पुर्ण नाही. तुझं नातं किंवा तुझे संबंध तू तुझ्या घराच्या चौकटी पासून भलेही लांब ठेवले असो, फक्त एक सांग तुझ्या मुलांच्या मोठे होण्याकडे पाहून, तुझ्यासारखेच असे नैतीक-अनैतीक नात्यांची किंवा संबंधाची त्यांना गरज पडली असती तर तू ते स्विकारु शकली असतीस का? नाही याहून असहनिय तुला काहीच नसते. तुला गरज पडू शकते तशी त्यांना का नाही? तुला फि कंट्री तशी त्यांनाही का नाही? प्रत्येकाला आपलीच गरज न आपलीच बाजू बरोबर वाटत असते. तोडून लावण्याचा किंवा दुखावण्याचा अजिबाद हेतू नाहीये माझा. अनैतीक संबंध जोडायला न टिकवायला वेळ लागत नाही. वेळ लागतो अनैतीक संबंधातून बाहेर पडून, स्वत:च्या अनैतीक मुल्यांची आहूती देवून, नैतीक संबंधात प्रस्थापित झालेला विश्वास अबाधीत ठेवायला. चौकटी बाहेर मैत्री अथवा काहीही असू दे! त्याची गढूळता वाढत आपलेच न आपण स्वत: फरफटले नाही जावू एव्हढीच काळजी घे..!
आधार देणारे बरेच असतात पण आधार बनून सोबत राहाणारे आपलेच असतात. अनैतीक का असे ना असतात काही संबंध पण! ते तेव्हढाच वेळ जेव्हढा वेळ आपण त्यांच अस्तित्व स्विकारतो. हळूहळू सुरवात होते तसा शेवटही सावकाश, हळूवार, तुटतंय याची जखम सुद्धा व्हायला नको. एकदम शेवट झालाच तर जखमा आयुष्यभर चिघळत राहातात. सल उरते मनात जी फक्त आतून पोखरत राहाते. बाकी समजदार तुम्ही स्वत:च आहात मी फक्त एक माध्यम आहे..!
.
----------------- © मृदुंग
kshanatach@gmail.com

काही..! :-)

क्षण..!

काही..!

रात्रभर थेंब-थेंब पडले काही
वेचायला पाहाटे उरले काही,

विसरता विसरता स्मरले काही
विस्मयात माझे निसटले काही,

बंद ओठात तरी उमटले काही
चाहूल म्हणत विस्कटले काही,

चालता चालता रुतले काही
कांच स्वप्नांचेच तुटले काही..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, July 21, 2014

अभावी..! :-)

क्षण..!

अभावी..!

कथानकातल्या जुन्या भागांचा आढावा घेवून, त्याच जुन्या जोराचा पुढचा भाग खरडणे म्हणजे, बुद्धीचा 'कस' आणि शब्दांचा 'चोथा' एकत्रीत करायला विचारांचा ताळमेळ प्रभावी सोडून अभावी होणे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, July 18, 2014

ऑर्कुट..! (निरोप)

क्षण..!

ऑर्कुट..! (निरोप)

काळही किती विचित्र आहे ज्या गोष्टी सुरु होवून अपुर्ण राहिल्या, त्यांचीच खाडाखोड आता करतो आहे. वाटतही बघ आता काहीच नाही. जपुन ठेवलेल्या वस्तुंची विल्हेवाट, एकदिवस लावावीच लागते. हे सगळेही ठरवून! भेटी-गाठीचे सगळे धागे-दोरे तोडून..!
"जे होतं ते चांगल्यासाठीच होतं". कदाचित, मी खोडणार नव्हतो म्हणून काळानेच पुढाकार घेतला असावा. सरते शेवटी काय तर आठवण सुद्धा पुसली जाते. जपली होती थोडी फार आठवण पण! पुढचा घेतला गेलेला श्वास शाश्वत असेलच असेही नसतेच ना..!
चालायचेच! म्हणून चालत जातोय. माध्यम कुठलंही अन् कुठेही असो, घर कसं बनवायचे ज्याला त्याला कळूनच जातं. थोड रुतत तरी आपली गाठ आपण फक्त सुटतांना नव्हे, आपले धागे मुळापासुन तुटतांना पाहातोय. आठवायचेच म्हणटलेस तर वेळ कमी पडेल एव्हढे आहे. आठवूनही काय होणार आहे आता..?
"पळपुटेपणा करुन अंग तर काढता येते, पण! जिथे मनाची आणि क्षणांची पहिली विट रचली गेली तोच पाया उपटून निघतांना यातना होणारच आहेत. बोलून व्यक्त होतील अन् सांगुन समजतील छे! दाखवल्या तरी दिसतील का..?
30-सप्टेंबर पर्यंत अवकाश आहे तसाही. संपणार आहे माहित असुनही साठवायचे तरी काय काय..? थोड तेव्हाही राहूनच जाणार आहे. मोकळे जगायला आणि व्हायला ही किंम्मत थोडीच वाटतेय. कुठे तरी असेही वाटते फार मोबदला दिला जातोय..!
'निरोप' आरोपांसकट दिला जातो म्हणतात. त्या आरोपांवर देखील चार बोटे आपलीच स्वत:वर उलटतात. होते तेव्हढे तर मी साठवून घेतले. उरले काय अन् गेले काय लावेल एकदिवस हिशेब. 'आठवणी ऑर्कुटच्या' मथळ्याखाली. तेव्हा कितपत आठवेल हाही प्रश्नच असेल. "विसरेल म्हणत लक्षात बरेच काही राहून जाते..!"

"बाय-बाय ऑर्कुट..!"
(दहा पैकी पाच वर्षे बरीच धुमाकुळ केली आहे. गेली दोन वर्षे तिथे शांतताच पसरुन आलोय..! पुढे म्हणजे (30-सप्टेंबर रोजी) थोडा ओलावा ठेवून आक्रोश खोडून घेतांना बघणार आहे..!)
.
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, July 14, 2014

नृत्यांगणा..! :-)

क्षण..!

नृत्यांगणा..!

एक क्षणच तिने नटराजाच्या मुर्तीकडे पाहिले अन् स्वत:भोवती गिरक्या घेत, थिरकनारी तिची पाऊले व्यासपीठाच्या मधोमध येवून स्थिर झाली. तबल्याचा ठेका थांबला, पायातला घुंगरु शांत झाला. मागे स्पंदनांचे ठोके उरले अन् कानात पावसाचे थेंब टपटपावीत तसे टाळ्यांचे मुसळधार आवाज. हजारोंच्या संख्येने तिचे चाहाते उपस्थित होते. तिला डोळ्यासमोर हवा असलेला हसरा-बोलका नटराज मात्र मुर्तीतच राहिला.
पाय थिरकतात तो पर्यंत घुंगरुत तुझी साद ऐकू येते. पहिल्या 'छण' मध्ये असे काय संचारते माझ्यात कि, पुढचे 'छण छणक छण छण' व्यक्त व्हायला आतूर झालेले भासतात. माझ्या पाऊलात छे! पाऊलांतल्या घुंगरुतच पाऊस बांधला जातो. 'मी' मी माझी नसतेच मग. फक्त एक सरिता होते खळखळत वाहानारी. कोवळी नजर भरुन तुझी मुर्ती बघते. एक कटाक्ष श्रोत्या वृंदात फेरुन, त्या नजरेत तुला शोधण्याचा निश्फळ प्रयत्न करते. पण! तू तुझ्या मुद्रेत तसाच तटस्थ.
तिरकिट धाs! करत नाद घुमतात. लय घेत घुंगरु स्वरांत विरघळू लागतात. वेगळ्याच उंचीवर घेवून जातात ते सुर. संथ वाहात लयाशी खेळत अवघडत ही साधिका असंथ उसळू लागते. थाप पडते एक अन् लख्ख विजेसारखी जागीच मी थिजून उभी असते.
चोरटे कटाक्ष तुझ्या मुर्तीकडे रेंगाळतात अन् हात जोडून उलट पाऊलीच मी लांब होते. घुंगरु मोकळे सोडून क्षणभर त्यांना बघते. कला तुझीच आहे जी मजवर प्रसन्न आहे. धुंदीत मग मी वेडी पाऊस पायांत बांधून का तरसत असते? का गिरक्या घेत असते? का तू सावरशील म्हणून तुझी वाट बघते? बघशिल एक नजर मला तू म्हणुन माझी नजर तुझ्यावरच ठेवते.
तू तसाच निश्चिल राहातो अन् मी आजही तशीच आधीर असते. अर्पुण स्वत:ला तुझ्या कलेत पुर्ण थोडी-थोडी मी करत राहाते. एक कलाकार म्हणून मन जिंकत राहाते. पाऊस बांधून उभी सर बरसत राहाते..!

तुझ्याशीच एकरुप होवून
बेधुंद मीही बरसत असते,
वेचून निसटलेला थेंब तो
झोळी माझी भरत असते
.
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

(© स्केच बाय माझ्या शब्दांची प्रेयसी..!)

Saturday, July 12, 2014

गुरु पौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा..! :-)

क्षण..!

गुरु पौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा..!

अपयशासारखा दुसरा एखादा गुरु मला तरी रुचला नाही. सातत्याने मानसांचे चेहरे वाचत मानसांबाबदचा माझा अनुभव फारसा चुकला नाही. सगळं असुन देखील वेगळं कसं राहावं; वर्तुळात राहून आपलं-परकं बाजुला कसं काढावं? वर्ण-भेद-जात स्विकारत, स्वत:च्या वेगळेपणाचे वर्चस्व ठासून सांगत, अलिप्त राहून 'मी पणाचा' स्वाभिमान वगळून, अंहकाराचा संभ्रम अबाधीत कसा ठेवावा? शिकवणारे तुम्ही-आम्ही सारखेच बोलून-डावलून बाजुला ठेवणारे मानसे गुरु म्हणन्यासारखीच आहेत.
आयुष्य तसा एक हळवा शिक्षकच असतो. मुखवटा ओढलेले चेहरे दाखवणारा. त्याहून अचरट प्रसंग उत्तम गुरु ठरतो. स्वभावात काही दोष नसतो. अंतरंगात चिकटलेली मानसांची नालायक वृत्ती वेळेवर तो समोर आणून ठेवतो. सक्षमता-बलाढ्य-सामर्थ्य एकत्रीत करुन जगण्याची अन् मनासारखे वागण्याची किंम्मत मानसाला हातभर लांब करुन मोजावी लागते. उपहास तरी होतोच 'हे सर्व अनपेक्षीत आहे' च्या मथळ्याखाली. प्रत्येकाच्या आयुष्याची भलेही पुस्तकं असो, त्यातली काही पाने वगळलेलीच असतात. जगासमोर येतात ते स्वच्छ सदरेच. कुठे तरी डाग लपवून ठेवलेले.
मार्ग दाखवणारा इथे गुरु कधीही नसतो. मार्गात आलेल्या संकटांना तोंड द्यायला सक्षम आणि सिद्ध करणारा खरा गुरु असतो. तोंडासमोर विनयशिल राहून पाठीमागे निंदा-नालस्ती करणारा एखादा शिष्य असतोच. आदर आचरणात असावा लागतो. उपकार आणि आधाराच्या कुबड्या नाकारुन 'वाईट' आपणच होत असतो. प्रत्येकाला सन्मान देवून 'देव' बनायची पात्रता कुठे कोण जपतो? परिस्थितीही ती जपू देत नाही. चालत राहायचे ठरवल्यावर अडवायला समोर मग भलेही आपलेच येवो. बेदखल करत वाटेवरुन पुढे जाण्यात शहाणपणच असते. चुकीच असे कधी कुणी नसतेच. जो-तो स्वत:च्या जागेवर बरोबर असतो.  दाखवलेला मार्ग अन् स्वत: निवडलेला मार्ग एव्हढाच काय तो मोठेपणाच्या पावसाळ्यांचा प्रभाव असतो. यात कमी लेखणे अथवा स्वत:ची फुशारकी मारणे विचारांचेच वावंटळ असते.
बोट धरुन सोबत चालत येणारा गुरु असण्यापेक्षा, झटकून बाजुला करुन तुमच्या क्षमतेवर आंधाळा विश्वास करणारा गुरु नेहमी योग्यच असतो. जग तर कुणाचीही सहज दखल घेतं, पण जगात असलेल्या मानसांना कुणाची दखल घ्यायला जरा वेळ लागतो. जगासारखे दुसरे घमंडी आणि स्वाभिमानी गुरु त्यांच्या विद्यार्थ्यांची निवड त्यांच्याच पद्धतीने करतात. नाही का..?

"जगासारख्या गुरुला जगासारख्याच गुरु पौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा..!"
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, July 10, 2014

थोडासा पाऊस ढगात राहून जातो..! :-)

क्षण..!

थोडासा पाऊस ढगात राहून जातो..!

थोडासा पाऊस ढगात राहून जातो... आठवण म्हणत तुझी सोबत घेवून जातो... आडवा उभा थेंब पडत सरळ निसर्ग करुन जातो... वेंधळा पाऊस ऐपत न पाहाता दाराबाहेर उभा राहातो... खिडकीत असतो मी ही, खिडकीत असते तू ही... गारवा मनात थोडासा रेंगाळून जातो... पाऊस येतो जरा वेळ बरसून निघून जातो... झटकून मनाला व्यापात जो-तो पुन्हा गुंतुन जातो... काही क्षण जातात अन् रिपरिपत पुन्हा पाऊस येतो... काय खेळतोयेस का आता तू ही? मनात प्रश्न येतो... खिडकीची फाटके बंद होतात... दाराकडे सहज नजर जाते... थोड दाराजवळ जाताच मंद गारठलेला वारा अंगावर हळवी झेप घेतो... प्रसन्न वाटते आपलीही कुणी दखल घेतो... मोकळेपणाने गडगडत हसून आभाळ पावसाचा जोर वाढवतो... विजा कडाडतात अन् मार्ग दाखवतात... पावसापर्यंत पाऊले स्वत:च चालत नेतात... उधान वारा शरिराशी सलगी करु लागतो... पापणी मिटून वादळ मनात घोंगावू लागतो... विजेसारखीच पापणी लखकण उघडते... कोरडाच आहे पाऊस अजुन ओले शरीर बोलून जाते... मनसोक्त भिजुन जातात दारं-खिडक्या... हवा असलेला पाऊस थोडा ढगात राहून जातो... विनवण्या केल्या कितीही नंतर खोटा दिलासा तेव्हढाच तो देवून जातो... पुन्हा भेटू असेच अधुरे आपण... थोडा तू तुझ्यात राहून जा, थोडा मी माझ्यात राहून जातो..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, July 8, 2014

हरकत नाही..! :-)

क्षण..!

हरकत नाही..!

चार पाऊले पुढे गेली हरकत नाही
दोन पाऊले मागे येवून पाहा,

चार धागे बांधले होते हरकत नाही
सहज दोन धागे सोडून पाहा,

लुभावत होते स्वप्ने हरकत नाही
उभे वास्तव स्विकारुन पाहा,

अवास्तव मागणे होते हरकत नाही
जमतंय का तुला घेवून पाहा,

उद्देश नव्हताच काही हरकत नाही
उद्धार तेव्हाढाच करुन पाहा,

चुकले होते माझे जरा हरकत नाही
चौकटीत अचुक राहून पाहा..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Sunday, July 6, 2014

जरासे..! :-)

क्षण..!

जरासे..!

चालत ढग आले जरासे
मातीत घुसमटले उसासे,

सांगे तू बोलतो मी असे
निसर्ग माझा वेगळा नसे,

फेकून तू थेंबांचेही फासे
कोरडेच तुझे मनही भासे,

भरुन आले डोळेच जसे
पाऊस म्हणावेही मी कसे,

पाणीही पाण्याला तरसे
श्रावण कुणाचा आज बरसे,

अबोल थेंबांशीच जरासे
बिनसले आहे माझे जरासे..!
------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, July 1, 2014

आयुष्याची चव..! :-)

क्षण..!

आयुष्याची चव..!

प्रेमाची भावना मनात जन्माला यायला लागल्यावर; असलेली मैत्री तुटेल असे प्रत्येकाच्या मनात येते. "आहे तसेच चालु द्यायला काय हरकत आहे?" हेच मनात असते. मित्र-मैत्रीण पुन्हा होवू शकतात. सुरवातीला झालेल्या नकळत्या मैत्रीतून एव्हढेही आपल्याला कळत नसते. आतल्या आत कुढत राहातो. एकमेकांच्या आयुष्यात चुक काय बरोबर काय दाखवत राहातो.
दिवस सरतात काळ बराच पुढे जातो. बाल्कनीतल्या खुर्ची-टेबलावर पाय लांब करुन बसलो असतो तेव्हा मनात येतं, चहा-कॅाफीची ही वेळ अजुन सुंदर झाली असती. रातीच चांदणं अजुन खुललं असतं अन् मनासारख्या आयुष्याची चव प्रत्येक क्षणात जिभेवर रेंगाळली असती. नाही का..?
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com