Powered By Blogger

Thursday, May 25, 2017

#पाळी..! :)


♥ क्षण..! ♥

#पाळी..!

ती : जो तो #पाळीवर लिहितोय तू पण लिही ना काहीतरी..?

मी : हाहाहा, झेपलं तर बघ..!

"नैसर्गिक काय सर्वदृष्ट्या सुदृढ असलेला प्रत्येक समाज आहे. या समाजाचा वासनेने हापापलेला वांझोटपणा त्याने त्यागल्यावर; त्याची स्त्रीला उपभोगण्याची लालसा जेव्हा कपड्यांच्या आतील सौंदर्य बघण्यात गुंतलेली असेल. तेव्हा त्याची मानसिक पाळी निसर्ग निर्मित आणि नियमित यायला लागेल. त्यावेळी त्या समाजासमोर फक्त आरसा धर...
..आणि सांग विवस्त्र (नागडं) दोघेही होऊ शकतो. अब्रुनुकसानीचे खापर आणि ओझं मला पेलून मिरवावं लागेल. अवघडल्या जागेचं कायमचं दुखणं होऊन बसेल. पण! नवनिर्मितीच्या या सुखद चक्राचे पाईक या समाजाला होता येणार नाही. याची एवढीच काय ती लाज मला माझ्या पदरात लपवलेल्या तोंडाला वाटते. बाकी तुम्ही आणि तुमच्या सामाजिक आस्था या समाज व्यवस्थेत बाटलेल्या आहेतच!
या अशा समाजात मला समरस व्हायचं नाही. वैचारिक कृतिशून्य समाज मला नकोय. कृतिशील निष्ठावान समाज मला हवाय आणि तो नसला तरी तो घडवणारा पुढचा अंश मलाच घरंदाज निपजायचा आहे. या गर्भधारणेसाठी मला शय्या करण्याची गरज नाही. माझे पतन झाल्यावरही सतत माझ्या शरीराचे स्वतःच्या वीर्यपतानासाठी तोडले जाणारे लचके खाणे बंद करा. शक्य झालेच तर आणखी एक "भूक आहे म्हणून अधाशासारखं खायचं नसतं." चव-चटक लागल्यावर म्हटलेलं नाही स्वीकारायचं असतं. हे स्वीकारणं शक्य नसेल तर तरुण अवस्थेत स्वतःच्या हातांचा आपण उपयोग केलेलाच आहे तो सातत्याने चालू ठेवावा..!"
(दिवस आणि रात्र #पाळीत)
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+91 73879 22843

Sunday, May 14, 2017

मातृश्री..! :-)


♥ क्षण..! ♥

मातृश्री..!

मातृश्री : काय मग मृदुंगा काय म्हणतात तुझे वाचक?
मी : कुठे काय काहीच नाही..!
मातृश्री : पत्र मग बरीच लांबलचक येतात त्यावर काय म्हणणं आहे तुझं?
मी : आई! तू वाचलेली आहेत ती पत्र आणि मी पाठवलेलं उत्तरही..!
मातृश्री : म्हणूनच विचारतेय ना कारट्या हे जे करुन ठेवलं आहेस ते आता बंद करु नकोस.
मी : वाचक शाश्वत नसतात आई. आज मला पत्र पाठवतात उद्या आणखी कुणाला पाठवतील. क्षणभराचा मोह आहे हा आणखी काही नाही..!
मातृश्री : अय, लेखकीय भाषेत माझ्याशी बोलायचं नाही कळलं?
मी : ते जाऊ दे आणखी काही सुधारणा असतील तर सांग..!
मातृश्री : काय सांगू? काही नवीन लिहायला घे! तुझ्या चाहत्यांना तेवढंच हवंय.
मी : सांग ना मग काय लिहायला घेऊ..?
मातृश्री : अर्धवट राहिलेल्या त्या कथेला पूर्ण करण्यापासून सुरुवात कर.
मी : अगं ती अर्धवट कथा तेवढीच चांगली वाटते. प्रत्येक कथेला शेवट असावाच असा कुठे नियम आहे..?
मातृश्री : तुला आलेल्या बऱ्याच पत्रांमध्ये त्याच अर्धवट कथेचा उल्लेख आहे. वाचकांच्या इच्छेला मारु नकोस पूर्ण कर.
मी : अगं पण...
मातृश्री : पण बिन काही नाही. पूर्ण म्हणजे पूर्ण कर.
मी : ठीक आहे सवड काढून करतो पूर्ण..!
मातृश्री : आणि जे डायरीत कुजत ठेवलं आहेस त्याचपण काही करा लेखक महाशय.
मी : डायरीतलं ते तुझ्यासाठी त्याच झालं काय व्हायचं ते..!
मातृश्री : असं का मग रद्दीत देऊन टाकू?
मी : तुझी इच्छा! :)
मातृश्री : बरं! टिश्यू पेपरवर लोकांना महत्त्वाचा मजकूर आठवणीने लिहून देण्याची कशी बुद्धी सुचली तुला?
मी : टिश्यू पेपर एवढा नाजूक पेपर दुसरा कोणता सापडला नाही. त्यात लोकांचं मन पण तसंच कोवळं हलकं-फुलकं असतंय ना..!
मातृश्री : काय कारणे देतोस ना एक एक! हो बाजूला.
मी : कारणे कुठे..? उत्तर दिलं मी..!
मातृश्री : (डोळे वटारून) मला शिकवशील
मी (मनातल्या मनात) : आळी मिळी गुप चिळी. मी चाललो बाहेर..!
मातृश्री : तळ्याकाठी जाऊन आताच संवाद लिहून पोस्ट कर..!
मी : तुला कसं कळत..?
मातृश्री : आई आहे तुझी ^_^
मी : काही बोलायलाच नको..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३