Powered By Blogger

Sunday, May 14, 2017

मातृश्री..! :-)


♥ क्षण..! ♥

मातृश्री..!

मातृश्री : काय मग मृदुंगा काय म्हणतात तुझे वाचक?
मी : कुठे काय काहीच नाही..!
मातृश्री : पत्र मग बरीच लांबलचक येतात त्यावर काय म्हणणं आहे तुझं?
मी : आई! तू वाचलेली आहेत ती पत्र आणि मी पाठवलेलं उत्तरही..!
मातृश्री : म्हणूनच विचारतेय ना कारट्या हे जे करुन ठेवलं आहेस ते आता बंद करु नकोस.
मी : वाचक शाश्वत नसतात आई. आज मला पत्र पाठवतात उद्या आणखी कुणाला पाठवतील. क्षणभराचा मोह आहे हा आणखी काही नाही..!
मातृश्री : अय, लेखकीय भाषेत माझ्याशी बोलायचं नाही कळलं?
मी : ते जाऊ दे आणखी काही सुधारणा असतील तर सांग..!
मातृश्री : काय सांगू? काही नवीन लिहायला घे! तुझ्या चाहत्यांना तेवढंच हवंय.
मी : सांग ना मग काय लिहायला घेऊ..?
मातृश्री : अर्धवट राहिलेल्या त्या कथेला पूर्ण करण्यापासून सुरुवात कर.
मी : अगं ती अर्धवट कथा तेवढीच चांगली वाटते. प्रत्येक कथेला शेवट असावाच असा कुठे नियम आहे..?
मातृश्री : तुला आलेल्या बऱ्याच पत्रांमध्ये त्याच अर्धवट कथेचा उल्लेख आहे. वाचकांच्या इच्छेला मारु नकोस पूर्ण कर.
मी : अगं पण...
मातृश्री : पण बिन काही नाही. पूर्ण म्हणजे पूर्ण कर.
मी : ठीक आहे सवड काढून करतो पूर्ण..!
मातृश्री : आणि जे डायरीत कुजत ठेवलं आहेस त्याचपण काही करा लेखक महाशय.
मी : डायरीतलं ते तुझ्यासाठी त्याच झालं काय व्हायचं ते..!
मातृश्री : असं का मग रद्दीत देऊन टाकू?
मी : तुझी इच्छा! :)
मातृश्री : बरं! टिश्यू पेपरवर लोकांना महत्त्वाचा मजकूर आठवणीने लिहून देण्याची कशी बुद्धी सुचली तुला?
मी : टिश्यू पेपर एवढा नाजूक पेपर दुसरा कोणता सापडला नाही. त्यात लोकांचं मन पण तसंच कोवळं हलकं-फुलकं असतंय ना..!
मातृश्री : काय कारणे देतोस ना एक एक! हो बाजूला.
मी : कारणे कुठे..? उत्तर दिलं मी..!
मातृश्री : (डोळे वटारून) मला शिकवशील
मी (मनातल्या मनात) : आळी मिळी गुप चिळी. मी चाललो बाहेर..!
मातृश्री : तळ्याकाठी जाऊन आताच संवाद लिहून पोस्ट कर..!
मी : तुला कसं कळत..?
मातृश्री : आई आहे तुझी ^_^
मी : काही बोलायलाच नको..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment