Powered By Blogger

Sunday, May 17, 2015

ती दोघं..! (जंजाळ)


♥ क्षण..! ♥

लिखानाची फर्माईश : वाचक / जाचक..!

विषय - ती दोघं..! (जंजाळ)

तो उलघडून न उलघडनारा. ती मन मोकळ्या स्वभावाची. मन प्रत्येकाला असतं, हृदय सुद्धा प्रत्येकालाचं असतं. आजच्या गतिमान काळात कुणी कुणाला भेटणे जेवढे सोपे आहे तेवढेच एकमेकांचे असूनही एकमेकांचे नसणे आधुनिक काळाची सगळ्यात सोपी संकल्पना आहे. तो आणि ती प्रगत झालेल्या सोशल जगात असेच एकमेकांना भेटतात. मैत्री करतात, एकमेकांना समजून घेतात. वेळोवेळी प्रसंगावधान राखून एकमेकांचे बनू लागतात. वेळेच्या धावत्या चकतीवर मैत्रीचे सुंदर आवर्तन गळून जाते. मैत्रीच्या रुजलेल्या बिजातून प्रेम नावाच्या अजस्त्र रोपट्याला हळूहळू पालवी फुटू लागते.
मैत्रीनंतर एकमेकांचे प्रेम उगवलेल्या रोपाला नियमित भांडणाचे, भावनांचे, जिव्हाळ्याचे, हळवेपणाचे, भावविभोर-क्षणभंगुर स्वप्नांचे स्वतःला जमेल तसं खत-पाणी देत राहाते. काळ थोडा-थोडका नव्हे, दिर्घकाळ सहवासाचा आनंद लुटू देऊन पुढे धावत राहातो. येणाऱ्या-जाणाऱ्या कित्येक आसवांच्या पावसाला मनातल्या मनात पेलून ठेवतो. कोवळया हृदयासोबत दगडाचे काळीज घडवू लागतो. दोघांना ठाऊक असतं आपण एकमेकांचे होऊ शकणार नाही. ठरवलं कितीही तरी आपले नाते जोडू शकणार नाही. नाते जोडले तरी दुखावलेली मने काळासोबतच्या प्रवाहात आपल्याला शल्य देणे चुकवणार नाही. तुला-मी, मी-तुला मिळवायचे म्हणून नाही, एकमेकांना गमवायचे म्हणून एकमेकांवर प्रेम करायचे.
लुभावण्या, निर्मळ, नैतिक नात्याला मग एक दिवस दृष्ट आपलेपणाचे सोंग घेऊन बसलेल्या समाज व्यवस्थेची लागते. विसरू न शकणारे दोघे एकमेकांना स्वतःचे मन मारून विसरून जातात. आपले आयुष्य कुणा परक्याच्या स्वाधीन असलेल्या चौकटीत समरस करून शरीराचे व्यवहार कोरडेपणाने चूकते करतात. ती ही तिच्या संसारात आणि तो ही त्याच्या कुटुंबात. मनातली पोकळी वेदना होऊन मुखावर देखाव्याची स्मित रेषा दोघेही बनवू लागतात. आपल्या इच्छेने व्यतित केलेला प्रत्येक क्षण समाज व्यवस्थेने नैतिक व्यवस्था विवाहात रूपांतरीत केलेल्या मालकी हक्कात एकमेकांच्या आठवणींना उजळा देऊ लागतात.
आठवण स्वतःचे सावट इतके प्रबळ करते की, पुन्हा दोघांना एकमेकांची ओढ लागते. मनाचे मनाशी असलेले, कुठल्याही अपेक्षेशिवाय निभावलेले प्रेमाचे नाते जगाच्या-समाजाच्या लेखी अनैतिक ठरू लागते. जग आणि समाज म्हणते तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचा काय दोष? तुमचे प्रेम होतेच तर लग्न केले तरी का? गुंता अधिक वाढण्या आधीच एकमेकांना स्वीकारले असते. अजुन दोन आयुष्य बरबाद केले कशाला? या वरचढ तुमचा जोडीदार कुठे तुमच्याशी अप्रामाणिक आहे? की, तुमच्या जबाबदारीत, कर्तव्यात कमी पडत आहे?
मनात भरलेली बाहुली आणि मनात भरलेला बाहुला एकच असते/असतो. बुद्धी मनाला नियंत्रित ठेवत नाही. मन स्वतःचा हेका सोडत नाही. मनाला वाटते तेच बुद्धीजीवी माणसे करतात आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसतात. आयुष्य खेळणे नसते आपल्या मनासारखा खेळ खेळता आला नाही म्हणून भातुकली मोडायची नसते. मोडू पाहणारी भातुकली सावरायची असते. आपली चौकट स्वतः आखायची असते. कुणाच्या कुंपनात आपण अतिक्रमण करायचे नाही. कुणाला आपल्या चौकटीत अतिक्रमण करू द्यायचे नाही. राहाता राहिला प्रश्न एकमेकांवरच्या प्रेमाचा आयुष्याचा एक दुःखद काळ म्हणून आठणीत ठेवण्यापेक्षा आयुष्याचा एक सुखद काळ म्हणून लक्षात ठेवायचा. शक्य तेवढे अजुन निर्बंध घालायचे मनावर.
नात्यासाठी समाज मान्यतेचा आणि आपल्यांच्या ऋणांचा आदर म्हणून केलेल्या व्यवस्था विवाहाचा अपमान करणे आपल्यावर घडलेल्या संस्कारांवर बोट उचलते. आपली नाती आणि समाज यांचे एकत्रीत जग स्वतःत आपल्याला स्वीकारण्यापेक्षा स्वतःपासून तोडण्याची संधी शोधत असते. आपली संस्कृती निर्भिड जगायचे शिकवण्यापेक्षा दुबळे-कमकुवत-प्रतिकार शून्य पराधीन मनुष्य घडवत असते. आपले आयुष्य आपल्याला कसे जगायचेय हे पंख फुटतांनाच, पंखात जोर एकवटत असतांनाच निर्णय सक्षम आपण व्हायचे असते. आयुष्याचे चांगले होऊनही आणि आयुष्याचे वाईट होऊनही; आपण आपल्या लेखी 'जे चांगलेय ते चांगलेय, जे वाईट आहे ते वाईट आहे' असेच सर्वांचे हिशेब चूकते करतो मग हे जग आणि हा समाज आपल्यामुळे आपल्यासाठी आहे. त्यांच्या आधीन राहून गुलामी करणे पत्कारायची की, स्वतःच्या पुढ्यात समाज व जगाला झुकवायचे स्वतः ठरवायला हवे आहे.
प्रतिष्ठा समाज देत नसते. स्वाभिमान जग देत नसते. आपल्या स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वामुळे विविध परिस्थितिशी झटण्यामुळे आलेला अनुभव आपला सन्मान करतो तेव्हा जगाला आणि समाजाला आपल्यामुळे स्वतःचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा प्राप्त होत असते. या आपल्याच समाजाला आपल्या परजातीय किंवा प्रेम विवाह यांचा काय आणि कसला फरक पडतो? याचे उत्तर समाज भूषणांकडेही नसते. चालत आलेल्या फडतुस परंपरेच्या नावाखाली बहिष्कार करून वाळीत टाकण्याचा केविलवाना प्रकार होतो. फारफार तर समाजातून उपेक्षित केले जाते. असे समंजस निर्णय समाजाची गादी परंपरेनुसार पुढे नेणारे घेऊ शकत नाही. आपला कायदा हा प्रत्येक स्तरातल्या सामान्य माणसाचा कधीही म्हातारा न होणारा बाप आहे. फक्त या कायद्याला तंतोतंत पाळणारी कायद्याची पिल्लावळे ही स्वतःला विकत असतात यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे आहे.
आपल्याला आपल्या मनासारख जगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. ठरवायचे, स्वतःला स्थिर करायचे आणि मनासारखेच आयुष्य जगायचे किंम्मत मोजून किंवा मोबादला देऊन आज या आधुनिक जगाची समाजाप्रति, आपल्यांच्याप्रति अभिरुढ प्रथांच्याप्रति मनात कणवं फारसे उरलेले असतेही आणि नसतेही. प्रेम निभावता नाही आले हरकत नाही. आपल्यासोबत कोणी जगतोय आणि आपल्याला जगवण्यासाठी झटतोय त्याच्याशी बांधली गेलेली आपली गाठ सोडण्यात सूजाणता नसते. मोहाचा क्षण ओसरल्यावर अर्थ कशालाच उरत नाही आणि एकदा आयुष्याचे दूध नासल्यावर ते फेकण्याच्याच पात्रतेचे (लायकीचे)उरते बाकी आयुष्य ज्याचे त्याचे गरज म्हणून नाते जोडले तर गरज संपल्यावरही निभावायचे. प्रेम करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळत असते पण नशिबात प्रेम आयुष्यभर लिहिलेले नसते. मनातले न बोलताच समजणे व स्वप्नांचा एक मूर्तबिंदु कुणा एकातच पाहाणे हा हट्ट असतो. यात आपले प्रेम कितीही मर्यादेच्या चौकटीत बसवले तरी जग आणि समाज त्याला अनैतिक म्हणूनच हिनावते. योग्य वेळेचा योग्य निर्णय घ्यायचा आणि त्यावर आयुष्यभर ठाम राहायचे. आयुष्याची पुढची पाऊले मागच्या पावलांची ठसे मिटवूनच उचलायची भुतकाळाचा प्रभाव आपल्या वर्तमानावर पडू द्यायचा नाही. भुतकाळाला मागच्या मागेच सोडून पुढच्या आयुष्याची मुहूर्तमेढ रोवयाची तेव्हाच आपले स्वतःचे घर आणि आयुष्य आपण सुंदर घडवू शकतो. मनात भरलेली व्यक्ती येवढ्या सहजा सहजी मनातून निघत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, निघूच शकत नाही. काळ उत्तम औषध असले तरी या औषधाचा परिणामकारक कडवट घोट हा भुतकाळातल्या आठवणींच्या साहाय्यानेच  स्वतःला पाजायचा असतो. आयुष्यात प्रेमाच अस्तित्व पुढे अप्रत्यक्ष स्वरुपातच असतं. त्याचा प्रत्यक्ष अट्टाहास करणे हा नैतिक ठरत नसतेच..!

"लेखकाला कुठला समाज नसतो आणि धर्म मुळीच नसतो". लिखानासाठी विषयाचा आशय दिल्याबद्दल वाचक / जाचकाचे आभार. उलघडूनही गुंता मुद्दाम तसाच ठेवलाय प्रत्येक ओळीचा स्वतंत्र अर्थ काढाल तर आयुष्य जगणे सोपे होईल. काय केलं होतं? यापेक्षा काय केलं आहे! या चौकटीत आयुष्याच्या प्रश्नांना ठेऊन उत्तरे स्वतःला द्यायची जगण्यात आणि जगू देण्यात मज्जा काय आहे तेव्हाच कळेल..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
*पत्र व्यवहारासाठी पत्ता :
'क्षणातच", पि.ओ बॉक्स क्रमांक 67, जळगाव हेड पोस्ट ऑफिस, जळगाव 425001

No comments:

Post a Comment