Powered By Blogger

Thursday, December 28, 2017

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-२)



♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-२)

..नुकताच पाऊस येऊन गेला. अर्थात तो पाहुणा आल्यागत वागलासुद्धा.
..मी म्हटलसुद्धा त्याला हे असं उभ्या उभ्या येऊन जाणं शोभत नाही.
..त्याच उत्तर म्हणजे आभाळात गडगडणं. वेंधळ्या वाऱ्याने गारठा लपेटून संपूर्ण शरीराला अल्हादाने अच्छादण.
..एकतर पाऊस वेळ सांभाळत नाही. निसटत्या थेंबांवरचा निरोप वाचत नाही.
..आरोप करायचे म्हटलें की, हा खुशाल दडी मारुन पसार.
..मग स्वतःच मन हलकं करायचं तरी कुठे? आणि कुणाकडे?
..मतलबाच्या या युगात सभ्यतेचे औदार्य दाखवतांना निसर्गही बेशिस्त वागतो.
तेव्हा माणसांची खुशामत करायला आणि खुशाली विचारायला वेळ कुणाकडे असतो?
..आल्यापाऊली माघारी फिरायची एक रीत झालेली आहे. या रितीच भाग्य असं की, प्रतिष्ठित असणं कर्तब झुगारण्यात सामावलेलं आहे.
कॅलेंडरच्या पानांवर कितीतरी वर्षे उलटून गेलेली आहेत. आताही एक वर्ष अगदी सहज उलटण्यात आलं आहे. दिवसांचा खेळ अवघ्या तासांच्या हिशेबावर येऊन ठेपला आहे. यात काही बदललेलं आहे. तर ते म्हणजे पूर्वीसारखा उत्साह आणि आनंद उरलेलाच नाही.  बेत आखायचे म्हटले की, कितीतरी रेषा कधीच खोडल्या गेलेल्या आढळत असतील. यांचा हिशेब लावता-लावता पुन्हा ओरखडे पडतीलच.

..जाऊ द्या. कसंय ना काही केलं तरी त्याला अर्थ नाही.
..काही वेगळं असं केलं नाही तरीही ते अर्थहीनच गृहीत धरलं गेलंय.
..त्यापेक्षा नकोच या नुसत्या उठाठेवी.
सामान्य दिवसासारखाच एक दिवस समजून घ्यायचा आणि पुढे चालत यायचं.
..मागे नजर गेलीच तर फिरलेली तोंड आणि बदललेल्या वाटांनी स्वतःची विषन्न अवस्था करुन घ्यायची.
..या हतबलतेशिवाय आपल्याला अजून काहीएक चांगलं अजूनतरी जमलं नाही.
मग कशाला ना पुन्हा अपेक्षांच्या झुल्यांना झुलवायच?
..सुंदर आयुष्याची फुलवलेली अख्खी बाग डोळ्यादेखत स्वतः आपणच जाळून टाकल्यावर स्वप्नांना गांभीर्य कशाचे आणि का वाटणार?
..जगण्याची तात्पर्य शोधण्यात आपला वेळ तसाही कसा निघून जातो? हे कळत नसल्यावर आणखीन काही आहे वेगळं या जगण्यात. हे सापडत कुठे? कळतं तरी केव्हा?
..तुला कळणार नाही, म्हणत आता माझं मलाच काही एक कळेनासं झालेलं आहे.
..तुला सगळं सांगायचं. मन व्यक्त करुन अबोल होयचं. हे आता फारसं सहज जमत नाही. माझ्याव्यतिरिक्त कुणाला फारसा मी समजत देखील नाही.
..मग अख्ख जग माझ्या विरोधात जाऊन बसले तरी मला त्याची पर्वा नसतेच.
..चौकटीच्या मर्यादेतून काही गोष्टी पाहिल्या की, सगळं व्यवस्थित वाटत असतं. याच गोष्टींना प्रेमाच्या भिंगातून पाहिलेस की, समजतं! सूर्याची किरणे हृदयावर एकवटून आग केव्हाच लागून गेलेली आहे.
..अंधारात आणि आधारात उठाठेवींचा एवढाच फरक असतो.
..त्यामुळे या नुसत्या उठाठेवी आता बंद.
..बंद म्हणजे बंदच!
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

No comments:

Post a Comment