Powered By Blogger

Thursday, May 8, 2014

कशीयेस तू..? :-)

क्षण..!

कशीयेस तू..?

गेल्या काही दिवसांपासून तिच्या मनात काय आहे? जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. उलट-सुलट विचारुन शब्दात पकडण्याचा खटाटोप करतो आहे. आयुष्य जगतांना खरंच आपण किती सराईत होवून जातो ना! आपल्या मनात जे आहे ते तसंच घुसमटत ठेवून निश्चिंत असल्याचा अविर्भाव; हसणा-या मुखवट्या मागे लपवून संकोचीत मनाने सगळे ठीक आहे बोलून जातो.

साधे-सुधे प्रश्न विचारतांना अवघडलेल्या अवस्थेत मिळणारे; एखादे उत्तर बंरच काही दडलंय याची चिंता देवून जाते. काळजी घे अन् काळजी करु नकोस इतकेच ओठ पुटपुटत राहातात. वास्तवीक जितके झटकण्याचा प्रयत्न बुद्धी करु म्हणते, तितकेच अधीक मन त्याच-त्याच विचारात गुंतुन शंका-कुशंकांनी स्वत:ला जखडून घेते.

सर्व ठीक असणं अन् तसे भासवणं कुशल नट-नटीलाही जमत नाही. ओळखणं काय बाजुलाच राहिले. बोलत एक असतो समजत दुसर असतो. कदाचित नको त्या गोष्टींचा अथवा परकं समजत असलेल्या व्यक्तींचा फार विचार करतो. 'चलता है यार' म्हणत स्वत:ची समजुत तरी किती काढावी? फार झाले! एकदाचे सरळ स्पष्ट विचारावे आता तर पुन्हा तेच उत्तर 'ठीक आहे'.

मान्य प्रतिकुल परिस्थितीतून ज्याला त्याला स्वत:ला मार्ग काढावा लागतो. जवळची मानसे हळवीच असतात तिथे निर्दयाने सर्व आतल्या आत गिळून तटस्थ असण्याचा निर्णय स्वत:लाच त्रास देत असतो. 'चल असु दे', काही नाही. ठीक आहेस तू तर अजुन काही विचारत नाही. वाटले तर नको वाटलं तर कळव "कशीयेस तू?"
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment