Powered By Blogger

Thursday, August 14, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! ( कथा) (भाग-11)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-11)

(सारांश रुपी शेवट..!)

पहिले कोवळे दिवस भर्रकण उडून जातात. गेलेल्या प्रत्येक क्षणात ओढ रुपी कित्येक गाठी पडतात. 'ताबा ठेवावा तरी मनावर' असे, मनाला सांगाण्या आधीच मन मुजोर कधीच झाले असते. वेळ नसतो तरी वेळ काढतो. निघालेल्या सवडीतला वेळ सतत कमी पडतो. भर-भरुन बोलायला काहीच नसते. बस! नजरे समोर असावे फक्त वाटत असते. परिस्थिती दोघांची सारखीच होते. मनाचे सोडा, आपल्याच हृदयावर आपली मालकी नसते.

कुणाला तरी शब्दांनी सुरुवात करावी लागणारच असते. 'त् त् प् प्' करत अडखळत एव्हढे सोपे आयुष्य तरी कुणाला लाभले असते..? तू बोल आणि तू बोल मौनात मनाचे गोडवे हुरळून गेले असतात. थोडा अवकाश घेतांना सवकाश निवळणारी वेळ भरधाव धावते. बदलत असते असणे कुणाचे. ओळखू लागतो नसणे कुणाचे. बस! हे असेच असावे. अधुरे पण पुर्ण, अपुरे पण पुरे. फार काही काय द्यावं कुणा? थोड काही काय घ्यावं कुणा? जे आहे ते चांगलेच मग, काही तरी राहिलंय का वाटते मना?

दिवसा वेळ मिळेल तसा तोडका-मोडका संवाद होतो. रात्री सवड काढून आवर्जुन वाद होतो. राग-राग येतो नुसता तरी नव्या पाहाटे जुनाच खेळ होतो. प्रेमाचा एक घास हाता-तोंडाशी येवून जिभेवर बेचव वाटून जातो. त्याच्याशिवाय ती राहू शकत नाही. तिच्याशिवाय तो राहू शकत नाही. एकमेकांशिवाय करमते कसे कुणीच सांगू शकत नाही. ठरवून काहीसे ती बोलायला सुरवात करते. सहज तिच्याही नकळत तो शेवट करतो. पुन्हा एकदा ठरवून तो सुरवात करतो. अजाणतेने ती पुन्हा शेवट करते.

नियती रुपी परिस्थिती त्यांच्या विनोदाचा पुर्ण निचोडून आस्वाद घेते. पुढे काय या साध्या विचारा अंती अंगावर काटा आणि मनात गुलाबी गुदगुल्या होवू लागतात. पुढाकार घेण्यास मन कच खातेच. स्वप्न म्हणावे तरी अस्तित्वात त्या स्वप्नाची किंम्मत मोजतांना हात अखडता होतोच. गुलाबी बंधाची रेशीम गाठ बांधतांना चौफेर विचारांना खुंटी बसतेच. आहे-आहे होईल-होईल आयुष्य जरा आनंद देईल. कधी-कुठे-कसे-केव्हा तरी भेट समोरा-समोर होईल. निसटू नये म्हणून सतत जपत जावे. काय नेमकं मनात का कळे ना असे का व्हावे?

सहज सोपे अवघड होवून बसते. साधेसुधे नखरे हजार करते. ती त्याच्यावर ढकलते. तो तिच्यावर ढकलतो. वेळ चालून आल्यावर निभाव कुणाचा लागतो?

भेट होईल किंवा नाही. नातं फुलेल किंवा नाही. शेवट हवा तसा असेल किंवा नाही. बागेत रोज एक गुलाब उमलतो. गंध त्याचा दरवळेल किंवा नाही. संवाद आवडून जातात. स्वभाव बदलून जातात. छोटसेच जग भलते गोल-गोल फिरवतात. अंबर-धारा दररोज आजुबाजुला दिसतात. छोट्या-छोट्या गोष्टीत भर-भरुन जगतांना दिसतात.
.
(समाप्त)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

( मनोगत : सर्व प्रथम पुढचा आणि शेवटचा भाग लिहिण्यास जरा उशीर झाला त्या बाबत 'क्षमस्व'. एव्हढ्यात कथा संपवेल असे वाटलेही नसेल तुम्हाला. खरे तर दाहाव्या भागा नंतर कथेला अजुन पाय फुटायला हवे होते, मान्य! त्यात बरेच मित्र-मैत्रीणी हक्काने सांगू लागले कि, शेवट गोडच असावा. मग सुचले असेच गोड किंवा कडवट काय हे न संपणारे प्रेमच आहे. आता-आता संपेल म्हणत अजुनच अजुन रंग भरनारे मनच आहे. नातं बनवून समोरोप का करावा? प्रेम असणे स्वत:तही एक नातंच तर आहे. सारांश रुपी कथेचा शेवट घोळ करु लागला. रास्तही होते ओढून ताणन्यात अर्थही फारसा नव्हता. गेले तिन-चार महिने पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत असलेल्या सगळ्या रसिकांचा मनापासुन आभारी आहे..! )

No comments:

Post a Comment